कर्जत | कर्जत तालुयातील बिरदोले गावातील २७ वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. उल्हास नदीजवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता. या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे? हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली.
नेरळ-कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते. रविवारी रात्री सर्वत्र ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला. सोमवारी (२६ मे) पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाटाने. त्यावेळी धुवाँधार पाऊस सुरू होता. त्यामुळे गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झाले आहे? हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला. तो पुन्हा घरी परतलाच नाही.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या रंगकाम ठेकेदाराकडे काम करणार्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. त्या विजेच्या प्रवाहात रोशन त्याच ठिकाणी कोसळला आणि विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटयात रोशनचे अंग काळेनिळे पडले. ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. मात्र नेरळ-कळंब रस्त्यावरील उल्हास नदीवरील दहीवली पूल पहाटेपासून पाण्याखालून गेल्याने पोलिसांना तळवडे पुलावरून त्या ठिकाणी पोहचावे लागले.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रोशनचा मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्री सर्व कामकाज पंचनामा झाल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. दुपारी तीन वाजता वीज अंगावर पडून मृत झालेल्या तरुणावर बिरदोले गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने बिरदोले पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून, रोशनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मदतीची होतेय मागणी
या नैसर्गिक दुर्घटनेत रोशन कालेकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने त्या तरुणाच्या कुटुंबाला आपत्कालीन मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.