पाली येथे अंबा नदीचे पाणी झाले गढूळ , नगरपंचायत हद्दीमध्ये गढूळ, चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा

By Raigad Times    28-May-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. मागील अनेक दिवसांपासून अवकाळी मुसळधार पावसामुळे अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. त्यामुळे पाली नगरपंचायत हद्दीमध्ये गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे.
 
परिणामी भाविक व नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. सलग चार-पाच दिवस पाली नगरपंचायतचे पाणी पूर्ण गढूळ येत आहे. याबाबत कोणीच काही उपाययोजना केलेली नाही. सुरेखा जाधव यांनी सांगितले की, पाली नगरपंचायतचे लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगरपंचायत कडून पुरवल्या जाणार्‍या पाण्यात जीवजंतू येतात. नागरिकांना अशा दूषित व गढूळ पाण्याचा वापर घरात स्वयंपाक करण्यासाठी पिण्यासाठी अंघोळीसाठी करावा लागतो. असे देखील सुरेखा जाधव म्हणाल्या.
कोणतेही शुद्धीकरण न करता पाणीपुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणार्‍या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात.
 
पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. शिवाय २७ कोटिंची शुद्ध पाणी पुरवठा योजना लालफितीत अडकली आहे.
मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. तसेच उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी अंबा नदीला बलाप जवळ बंधारा बांधण्यात येतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर बंधार्‍याचे दरवाजे उघडले जातात. मात्र आता उन्हाळ्यातच मुसळधार पाऊस आल्यामुळे आणि बंधारा बंद असल्यामुळे नदीच्या पाण्याला वाहण्यासाठी मार्ग नाही.
 
परिणामी पाणी तिथेच साठून राहिल्यामुळे ते अधिक गढूळ होत आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे. पाली शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील करत आहोत. मात्र यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. -प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली