मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागणार ; २६ मेपासून तिकीट दरात २५ रुपयांची वाढ होणार

By Raigad Times    22-May-2025
Total Views |
 uran
 
उरण | मोरा (उरण) ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात २६ मे पासून पावसाळी हंगामासाठी २५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रवास ८० रुपयांवरुन १०५ रुपयांवर पोहोचणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात भरमसाठ वाढ केली जाते.
 
यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी ८० रुपयांवरुन थेट १०५ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्धे तिकीट ३९ रुपयांवरुन ५२.५० रुपयांपर्यंत म्हणजे १३.५० रुपयांची वाढविण्यात येणार आहे. पावसाळी हंगामासाठीची ही तिकीट दरवाढ २६ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.
 
पावसाळी हंगामासाठी या तिकिट दरवाढीची मंजुरी मेरिटाईम बोर्डाकडून याआधीच घेण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरिक्षक नितीन कोळी यांनी दिली. मोरा-भाऊचा धक्का हा सागरी मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत फायदेशीर, सुखद आणि ‘शॉर्ट कट’ म्हणून ओळखला जातो. वाहतूक कोंडीची दगदग नसल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
 
त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्यामुळे मांडवा- अलिबागकडे जाणार्‍या प्रवाशांची मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. दरम्यान, तिकीट दरवाढीनंतरही प्रवाशांच्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. उलट प्रवाशांना नशिबात ‘गळक्या’ प्रवासी बोटी आणि समस्यांचाच अधिक सामना करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.