रायगडात दोन धरणांसाठी ११ हजार २६३ कोटी ; धरणे होणार रायगडात, पाणी जाणार ठाण्याला!

पोशीर आणि शिलार धरणांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

By Raigad Times    21-May-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये पोशीर आणि शिलार याठिकाणी राज्य सरकार दोन नवीन धरणे बांधणार आहे. यासाठी सुमारे ११ हजार २६३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मंगळवारी (२० मे) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
 
ही दोन्ही धरणे रायगडात होणार असली तरी या धरणातील पाणी पनवेल महापालिका वगळता प्रामुख्याने मुंबई, ठाणे जिल्ह्यासाठी पुरवले जाणार आहे.कर्जत तालुक्यातील कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर १२.३४४ टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९.७२१ टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी ७.९३३ टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी १.८५९ टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे.
 
या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (३३.९६ टक्के, २१७१.४५ कोटी रूपये), नवी मुंबई महानगरपालिका (४३.५३ टक्के, २७८३.३७ कोटी रूपये), उल्हासनगर महानगरपालिका (९.५६ टक्के, ६११.२८ कोटी रूपये), अंबरनाथ नगर परिषद (७.०७ टक्के, ४५२.०६ कोटी रूपये), बदलापूर नगर परिषद (५.८८ टक्के, ३७५.९७ कोटी रूपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे.
 
KARJT
 
हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. दुसरे धरण याच तालुक्यातील चिल्हार नदीवर शिलार नदीवर ६.६१ टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. या योजनेस ४८६९.७२ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे.
 
त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी १५.०८, रक्कम ७३४.३५ रूपये कोटीत), पनवेल महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी ७५.४२, रक्कम ३६७२.७५ रूपये कोटीत), नवी मुंबई महानगरपालिका (भांडवली खर्चातील हिस्सेदारी टक्केवारी ९.५, रक्कम ४६२.६२ रूपये कोटीत) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे. सदर प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
स्थानिकांना पाणी मिळणार का?
शिलार धरणामुळे भविष्यात चिल्हार नदी बारमाही वाहती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणे धरण बांधले जाणार असल्याने येथील नागरिकांची तहान भागविली जाईल, अशी अपेक्षा स्थानिकांना आहे. मात्र ही दोन्ही धरणे ठाणे जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी होत असल्याने प्रत्यक्षात कर्जत आणि रायगडकरांना या धरणांचा फायदा किती होईल? हे काळच ठरवणार आहे.
 
तर २००५ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरणकडून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला आहे. धरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी येणार्‍या अधिकार्‍यांना स्थानिक ग्रामस्थ पिटाळून लावत होते.त्यामुळे बोरगाव येथे होणार्‍या धरणाला शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध आहे.