अलिबाग | भारत-पाक सीमेवर दोन्ही देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. त्याअनुषंगाने नागरिकांच्या, सागरी सुरक्षेच्या तसेच मर्मस्थळांच्या सुरक्षेकरीता विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात पोलीस दलातर्फे मॉकड्रिल राबवण्यात आले आहे. युध्दजन्य परिस्थिती मध्ये किंवा अचानक होणार्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे त्याचे सर्वस्वी अभ्यास करण्यात आले आहे. जिल्हयातील किनारपट्टी सुरक्षा सक्रिय करण्यात आलेली असुन ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईट लावण्यात आलेले आहेत. सागरी किनारे, लॅन्डींग पॉईट, बेटे यांना नियमित भेटी सुरू आहेत.
सागरी किनारी असणारे गावांना भेटी देऊन विशेष काळजी घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे, मच्छिमार बांधवांसह संपर्कात असून अनोळखी बोट किंवा इसम दिसल्यास तात्काळ त्यासंबंधीत सूचना कळविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विशेष सुरक्षित असणार्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. रायगड पोलीसांचा सोशल मिडीया सेल भारत-पाक तणावावर विशेष लक्ष ठेवुन आहे. आक्षेपार्ह पोस्ट किंवा कमेंट करणार्या तसेच अफवा पसरवणार्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
आपल्या सुरक्षिततेसाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे. सद्य परिस्थितीत सतर्क राहावे, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
आपत्कालीन कार्य केंद्र २४ तास कार्यरत राहणार
युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील महसूल प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सर्व विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४ तास कार्यरत ठेवावेत. जिल्ह्यातील सर्व सैन्य दलांशी सतत समन्वय ठेवावा. या प्रतिसाद दलांशी दररोज संवाद साधावा. जिल्ह्यांमध्ये रेशन आणि औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा.
कोणतीही अनावश्यक साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. जिल्ह्याच्या अधिकृत समाज माध्यमांद्वारे आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि अफवांना प्रतिबंध करावा. नागरिकांना अधिकृत माहिती बाबत माध्यमांबद्दल जागरुक करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिल्या आहेत. आवश्यक असल्यास, जिल्ह्यासाठी सुरक्षित स्थलांतराची योजना तयार करावी.
स्थलांतरित लोकांसाठी सुरक्षित निवारा केंद्रे निश्चित करावी व सदर निवारा केंद्रे सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करावी. या निवारा केंद्रापर्यत पुरेसे अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आवश्यक असलेल्या ठिकाणी सायरन खरेदी करून स्थापित करावेत.जिल्ह्यात कोणतेही युद्ध संबंधित सैन्याचे सामान (उदा., गोळाबारीचे अवशेष) पडलेले आढळल्यास, नागरिकांनी ते स्पर्श करू नये याबद्दल तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षास कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.