नागपूर | लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात एकूण २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज नोंदवण्यात आले होते. यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज महिलाविभागाने ग्राह्य धरल्याची माहिती, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली.
या लक्षवेधीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना योजनेबाबत प्रश्न विचारले. या योजनेतील गैरप्रकाराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी प्रभु यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे बोलत होत्या.
माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या २६ लाख अर्जांच्या डेटाचे क्रॉस-व्हेरिफिकेशन करताना केवळ ४ लाख अर्जांच्या पुनर्पडताळणीची आवश्यकता आढळली. उर्वरित सर्व अर्ज पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले. योजनेसाठी आवश्यक असलेली विभागनिहाय माहिती ही संबंधित विभागांकडून मागवण्यात आली होती. कृषी विभागाकडील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी, अन्न व नागरी पुरवठा विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडील डेटाचा वापर करून लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली.
लाभ घेण्यास अपात्र असलेले सुमारे ८ हजार शासकीय कर्मचारी (मुख्यतः आरोग्य व इतर सरकारी यंत्रणांमधील कर्मचारी) यांनी घेतलेले रकमेची रिकव्हरी प्रक्रिया मागील ५-६ महिन्यांपासून सुरू असून पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. साधारणपणे १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडलेली असल्याचे पडताळणीत दिसून आले. अनेक महिलांची वैयक्तिक खाती नसल्यामुळे त्यांनी घरातील वडील, भाऊ किंवा पती यांची खाती दिल्याचे स्पष्ट झाले.
विभागाने अशा प्रकरणांचे सखोल परीक्षण करून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री केली आहे. लाभार्थींचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई- केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून, उर्वरित लाभार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध आहे.