किरकोळ वाद ; धावत्या रेल्वेमधून फेकले, तरुणाचा मृत्यू

By Raigad Times    08-Oct-2025
Total Views |
 karjat
 
कर्जत | भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. वा वाद विकोपाला गेल्याने चालत्या गाडीतून एका तरुणाला फेकण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव विनोद दरचंद कांबळे (वय २०, रा. वडगाव, पुणे)असे आहे.
 
तो आपला मित्र गणेश देवकर (वय २६) याच्यासोबत मुंबईकडे प्रवास करत होता. दोघे कोणार्क एक्स्प्रेसच्या दरवाजाजवळ बसले होते. यादरम्यान, दुसर्‍या एका प्रवाशाला थुंकण्यासाठी जागा हवी असल्याने त्याने उठण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. ही घटना मंगळवारी (७ ऑक्टोबर) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास भिवपुरी स्थानकाच्या अलीकडे घडली. झटापटीच्या दरम्यान विनोद गाडीतून खाली फेकला गेला.
 
रेल्वे पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदचा मित्र गणेश सुखरूप असून त्याने प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी अकोला येथील मंगेश रामदास दरोसे (वय ३६) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, मंगेश चुकून मिरजहून अकोला ऐवजी मुंबईकडे जाणार्‍या कोणार्क एक्स्प्रेसमध्ये चढला होता. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.